जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा
वृक्ष जगवा, माणूस जगेल- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर दि.५ – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज जिल्ह्यात वृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. जटवाडा, रहाळ पट्टीतांडा येथे वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. त्यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत व शहर हद्दीतही वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली. जटवाडा रहाळ पट्टीतांडा येथे वन विभाग, १३६ इको बटालियन यांच्यावतीने ३१ हजार वृक्ष लागवड करण्यात आली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. वन विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या क्षेत्रावर इको बटालियन तर्फे ३ लाख वृक्ष लागवड करण्यात येत असून त्याचा शुभारंभ आज करण्यात आला.
“शुद्ध हवा, शुद्ध पाणी जे जगण्यासाठी नितांत आवश्यक आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. पैसा, प्रॉपर्टी, मालमत्ता आपल्या मुलांसाठी मागे ठेवतांना त्यांच्यासाठी शुद्ध हवा, पाणी यांचीही तरतूद करुन ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्ष लावा, वृक्ष जगवा म्हणजेच माणूस जगेल” असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज वृक्ष लागवडी करीता आवाहन केले.
या उपक्रमात गायत्री परिवार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, एनसीसी इ. सहभागी झाले होते. सरपंच छाया चव्हाण, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, कर्नल निर्देश साहा, लेफ्ट. कर्नल अमित प्रभू, मेजर अनिरुद्ध काळे, मेजर प्रमोद बहिरथ, सुभेदार मेजर चंद्रमा सिंग, सुभेदार विष्णू बढिया, नायब सुभेदार देवकर, तहसिलदार रमेश मुनलोड आदी उपस्थित होते.