"संसर्गजन्य आजारांबाबत खबरदारी बाळगा" - दिलीप स्वामी जिल्हाधिकारी (छत्रपती संभाजीनगर)
ग्रामिण व शहरी भागातील आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहून लोकांचे आरोग्य विषयक प्रबोधन करावे

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.०३/०६/२०२५
सध्याच्या काळात देशात आणि राज्यात अवकाळी झालेला पाऊस, तापमानातील चढ उतार आणि त्यातच लवकरच येऊ घातलेला पावसाळा अशा परिस्थितीत जिल्ह्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. ग्रामिण व शहरी भागातील आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहून लोकांचे आरोग्य विषयक प्रबोधन करावे व संसर्गजन्य आजारांबाबत खबरदारी बाळगावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
वातावरणातील बदल पाहता जिल्ह्यात संसर्गित आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच राज्यात कोविडच्या रुग्णांची संख्याही आढळून येत आहे. काल (दि.२) पर्यंत जिल्ह्यात कोविडच्या ३८४ चाचण्या होऊन ८ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यापार्श्वभुमिवर जिल्ह्यात खबरदारी बाळगण्याच्या सुचना शासनाकडून प्रशासनास प्राप्त झाल्या आहेत.त्यानुसार जिल्ह्यात कोविड सदृष्य लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणे, वृद्ध व सहव्याधी असलेल्या लोकांची अधिक काळजी घेणे याबाबत नागरिकांना जागरुक करावे. श्वसन संस्थेशी संबंधित आजारांच्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या दृष्टीने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी सतर्क रहावे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये मात्र खबरदारी बाळगावी,असेही त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचा आढावा आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा नियोजन अधिकरी भारत वायाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे, घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश हरबडे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.