आता QR कोडद्वारे तक्रार-सुचना नोंदवा; प्रशासनाचे एक पाऊल डिजीटल कडे
या उपक्रमामुळे नागरिकांना कार्यालयात येऊन तक्रार अर्ज देण्याचा त्रास टळेल - दिलीप स्वामी.

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर – आपल्यावर होणारा अन्याय, कामकाजातील दिरंगाई यासाठी नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता यावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी QR कोड ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. फक्त QR कोड आपल्या मोबाईल मध्ये स्कॅन करा आणि आपली तक्रार वा सुचना नोंदवा, अशी ही अभिनव संकल्पना असून आजपासून प्रत्येक तहसिल व उपविभागीय कार्यालयांमध्ये हे QR कोड प्रदर्शित करण्यात आले आहेत.
नागरिकांना तक्रार व सूचना नोंदविताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये व उपविभागीय अधिकारी (SDM) कार्यालयांमध्ये तक्रार पेटीशेजारी QR कोड लावण्यात आले आहेत. या QR कोडच्या माध्यमातून नागरिक आता आपली तक्रार किंवा सूचना डिजिटल पद्धतीने थेट नोंदवू शकतील. जिल्ह्यात सध्या १६ ठिकाणी तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत.
उपक्रमामुळे नागरिकांना कार्यालयात येऊन तक्रार अर्ज देण्याचा त्रास टळेल. प्रवास खर्च वाचेल, तसेच, ज्यांना डिजिटल प्रणालीचा वापर शक्य नाही, अशा नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच तक्रार किंवा सूचना लिहून पेटीत टाकण्याची सुविधाही उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हा उपक्रम पारदर्शक, तत्पर आणि उत्तरदायी प्रशासनाकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
QR कोड स्कॅन केल्यावर नागरिकांनी आपली प्राथमिक माहिती (नाव, फोन नंबर इ.) भरुन आपली तक्रार वा सुचना टाईप करुन नोंदवावी. ही तक्रार अपलोड केल्यावर ती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात प्राप्त होईल. ती तक्रार तात्काळ संबंधित तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल व तक्रारी, सुचनांच्या अंमलबजावणीबाबत पाठपुरावा व आढावा घेण्यात येईल.
नागरिक कोणत्याही भीतीशिवाय आपले मत नोंदवू शकतात अशा प्रकारे, हा उपक्रम म्हणजे शासकीय कार्यपद्धतीत नव कल्पना आणून उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासन उभे करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.