पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या मनमोहन सिंग यांच्या आठवणी
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी फाळणीच्या वेळचे काही संदर्भ आपल्या व्हिडीओमध्ये दिले. “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आपल्या सगळ्यांनाच मोठं दु:ख झालं आहे. त्यांचं आपल्यातून जाणं एक देश म्हणून आपलं खूप मोठं नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात खूप काही गमावल्यानंतर भारतात येणं आणि इथे आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत यश संपादन करणं ही सामान्य बाब नाही. कमतरता आणि संघर्षांमधून पुढे येऊन कशा प्रकारे नवी क्षितिजं गाठली जाऊ शकतात, याची शिकवण त्यांचं जीवन भावी पिढीला देत राहील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संदेशाच्या सुरुवातीलाच नमूद केलं.

“पंतप्रधान म्हणून त्यांचं योगदान…”
“एका चांगल्या व्यक्तीच्या रुपात, एका विद्वान अर्थतज्ज्ञाच्या रुपात आणि सुधारणांच्या बाबतीत समर्पित नेत्याच्या रुपात त्यांना कायम स्मरणात ठेवलं जाईल. एका अर्थतज्ज्ञाच्या रुपात त्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर भारत सरकारमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. एका आव्हानात्मक काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारीही सांभाळली. माजी पंतप्रधान भारतरत्न पी. व्ही. नरसिंह राव सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना त्यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या देशाला नव्या अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आणलं. पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासात आणि प्रगतीमध्ये त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील”, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांनी विविध पदांवर राहून देशाच्या केलेल्या सेवेचा उल्लेख केला.