"लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी आर्थिक मदत नाही,जगण्याचा आधार आहे" - कष्टकरी महिला
योजना कधीही बंद पडणार नाही!"- मुख्यमंत्री

मुंबई : रसिकाश्रय या संस्थेने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली.
“लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच “ही योजना कधीही बंद पडणार नाही!”
अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांच्या भेटीप्रसंगी दिली. त्यांच्या भावना समजून घेत “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतोय,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भेटीदरम्यान महिलांनी आणखी एक विनंती केली की, “सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत.” यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ” शासन पातळीवर या मागणीचा विचार करू,” असे सांगितले.
तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजने’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती, तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता.
“आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला. गेल्या दोन दिवसांत आम्हाला स्वर्गासारखी अनुभूती मिळाली,” असे एका महिलेने सांगितले.